वाचन लेखन का करावे?



लेख क्रमांक - १: 

"पुस्तके कशाला वाचायची? पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही"

"इतरांच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्यासाठी पुस्तके वाचावीत! त्या चुका आपण करून नये यासाठी!"

"पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे. चुका करत करत शिकणे मला आवडते! माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! अनुभवातून!"

"मान्य आहे. अरे पण, जीवनातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या चुकांतून शिकून शिकून त्यातील तत्वज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते. समजा तुला अनुभवातून शिकत शिकत एखादी गोष्ट समजली पण तोपर्यंत त्या अनुभवाचा उपयोग करण्याचे वय आणि वेळ निघून गेली असेल तर? आणि तुझ्या अनुभवातून आणि चुकांतून तू जो निष्कर्ष काढला तो जसाच्या तसा जर का या आधीच कुणी महान लेखकाने व्यवस्थित पुस्तकरूपात लिहून ठेवलेला असेल तर? तेवढा आपला वेळ नाही का वाचणार? एखादी चूक होण्यापूर्वीच आपण ती टाळू शकणार!"

"पण लेखकाची आणि आपली पार्श्वभूमी, आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. लेखकाचे सगळे अनुभव आपल्याला कसे लागू होतील? सांग बरे?"

"अरे! सगळे अनुभव नाही लागू होणार पण काही टक्के तर नक्कीच होईल! पुस्तकातून आपल्याला प्रेरणा मिळते. शेवटी, लेखक हाही एक आपल्यासारखाच माणूसच असतो ना! त्याच्या भावना आणि आयुष्याच्या अवस्था- उदाहरणार्थ - प्रेम, लोभ, मत्सर, सुख, दु:ख, तारुण्य, बालपण वगैरे या आपल्या सारख्याच असतात की! सगळ्या माणसांच्या भावना शेवटी सारख्याच! त्यासंदर्भातील त्याचे अनुभव बऱ्याच प्रमाणात सगळ्या माणसांना लागू होणार नाहीत का? लेखक एलियन थोडेच असतो? माणूसच असतो. आपल्यासारखाच! आलं का लक्षात? आणि पुस्तकातून विचारांना चालना मिळते, आपण विशिष्ट प्रकारच्या संकुचित विचारांतून बाहेर पडून नवनवीन विचार स्वीकारायला शिकतो! आपल्या विचार कक्षा रुंदावतात!

"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे असं वाटतंय बरं का!"

"आहे ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?"

- निमिष सोनार (एक पुस्तक प्रेमी आणि वाचन समर्थक!)

लेख क्रमांक - २: 

"निमिष, तू स्वत:ला काय मोठा तत्त्वज्ञानी समजतोस की काय?" माझ्या एका जुन्या परम मित्राने मला एकदा चिडून विचारले.

मी हसून म्हणालो, "का रे मित्रा? असे तुला वाटण्याचे कारण काय बरे?"

आम्ही पुण्यातल्या एका उपहारगृहात मस्त अमृततुल्य चहा घेत होतो. हा मित्र दहा वर्षानंतर प्रथमच मला प्रत्यक्ष भेटला होता.

मित्र चहाचा घुरका घेत म्हणाला, "कारण रोज मी पाहतो, सोशल मीडीयावर विशेष करून फेसबुक आणि व्हाटसएप वर किंवा इतर मराठी वेबसाइटवर तू सतत ज्ञान पाजळत असतोस. आपण हे करायला हवे, आपण ते करायला हवे असे सांगत असतोस. मोठमोठे लेख लिहितोस. इतर मेसेज जास्त फॉरवर्ड न करता बहुतेक वेळा स्वत:च लिहीत असतोस. एव्हढा मोठा तत्त्वज्ञानी झालास काय गेल्या दहा वर्षात? एवढं सगळं सुचतं तरी कसं तुला?"

मी स्मितहास्य करून म्हणालो, "हे बघ , मी लिहिताना असे थोडेच म्हणतो की मी तत्त्वज्ञानी आहे! "लेखक- निमिष सोनार - एक तत्त्वज्ञानी" असे मी थोडेच टाकतो लेखासमोर?"

"तसे टाकत नाही म्हणून काय झाले, पण लेखातून तर तू तत्त्वज्ञान शिकवत असतोस सर्वांना!"

"नाही! मुळीच नाही. लोकांना तत्त्वज्ञान शिकवण्या इतका मी कुणीच नाही मित्रा! मी जे लिहितो ते अनुभवातून आलेले असते, माझ्या किंवा दुसऱ्याच्या! तुला किंवा वाचणाऱ्या व्यक्तींना ते तत्त्वज्ञान वाटतंय तर मग ते तत्त्वज्ञान असेलही!" मी डोळे मिचकावत म्हणालो.

"शब्द उलट सुलट करून मला गोंधळात टाकू नको!" थोडा शांत होत तो म्हणाला.

"शब्द हे शब्दच असतात. ते सुलटच असतात. घेणारा फक्त सुलट शब्दांचा उलट अर्थ घेऊ शकतो. बाकी काही नाही!" मी म्हणालो.

हे पटल्यासारखे वाटून तो पुढे म्हणाला, "पण मला एक सांग, की तू लिहितो ते सगळ्यांना सांगतोस पण स्वत: ते करतोस का? पाळतोस का? की फक्त लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि ..."

मी म्हणालो,"मित्रा, तूच वर म्हणाला त्यानुसार "आपण" हे करायला हवे, "आपण" ते करायला हवे असे मी लिहितो. लोकांनी असे करावे, तुम्ही असे करावे असे मी लिहीत नाही. आपण म्हणजे त्यात मी सुद्धा आलोच की रे!"

"होय. तेही खरंच आहे. आणि तुझा मेसेज आला की तो मला वाचावासा वाटतोच! एक प्रखर आग असते बरेचदा तुझ्या लेखनात!"

"हे तर अधिक चांगले झाले. माझ्या लेखामुळे किंवा त्यातल्या प्रखरतेमुळे शंभर वाचकांपैकी एकाला जरी वैचारिक फायदा किंवा बदल झाला किंवा शंभरात एकाला जरी वाचून चीड आली तरी माझ्या लेखनाचा उद्देश सफल होतो ना मित्रा! एका लेखकाला अजून काय पाहिजे? वाचकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्यात थोडा का होईना वैचारिक बदल! एवढेच!"

मित्राला अजूनही काही शंका होत्याच...

तो म्हणाला," पण, एक सांग तू जे लिहितो, ते तुझ्याबाबत घडलं असलं पाहिजे, त्याशिवाय ते इतकं प्रखर तू कसं लिहू शकतोस?"

मी पुन्हा म्हणालो, "नाही. मुळीच नाही. असं जरुरी नाही की मी जे लिहितो ते सगळं माझ्या बाबतीत घडलेलं आहे. जर एखादा लेखक फक्त आपल्या बाबत घडलेलेच खूप ताकदीने लिहू शकत असेल तर काय फायदा अशा लेखनाचा? मला संवेदनशीलतेमुळे एक अंत:स्फूर्ती, ऊर्मी आणि प्रेरणा मिळते तेव्हाच मी नीट लिहू शकतो."

"म्हणजे, मला समजले नाही?"
"हे बघ. मी थोडासा इतरांपेक्षा जास्त संवेदनशील आहे. एखादा टीपकागद असतो ना तसा! मला वाटते प्रत्येक लेखक हा संवेदनशील असतोच. लेखकच नाही तर चित्रकार, कवी आणि कोणताही कलाकार, अभिनेता हे संवेदनशील असतात, किंबहुना ते असावेत. त्याशिवाय एखादा अभिनेता कुणा एका पात्राची भूमिका कशी वठवू शकेल बरे? त्या पात्राच्या सुख दु:खाशी समरस झाल्याशिवाय! आणि समरस तेव्हाच होवू शकतो जेव्हा तो कलाकार संवेदनशील असतो. तसेच लेखकाचे सुद्धा असते. आणि मी सुद्धा आहे! आजूबाजूच्या वातावरणातील, जगातील सूक्ष्म बदल माझे मन टिपते. अवतीभवती जे लोक असतात त्यांच्या मनात काय चालले असेल, ते सध्या कोणत्या परिस्थितीत आहेत मग ती चांगली असो अथवा वाईट हे मला एखादे वेळेस त्यांनी न सांगताच काही वेळा कळते. काही वेळा ते सांगतात तेव्हा कळते. त्यांच्या सुख दु:खाला मी लेखनातून जगासमोर मांडतो. ते ही तेवढ्याच ताकदीचे लिखाण असते जसे की ते माझ्यासोबतच घडले आहे!"

एक आवंढा गिळून तो म्हणाला "बापरे! एवढं सगळं असतं का आणि असावं लागतं का लेखकांमध्ये क.. क.. कमाल आहे तुझी बरं का निमिष!"

"माझी कमाल वगैरे काही नाही. संवेदनाशीलता आणि लेखनाची अंत:स्फूर्ती आणि प्रेरणा ही मला मिळालेली दैवी देणगी आहे. त्यात माझा काही रोल नाही. मी फक्त माध्यम आहे रे! दैवी देणगीचा उपयोग केलाच पाहिजे!"

"वा! हे म्हणजे अगदी असं झालं की..."

"अरे जाऊदे! राहू दे! अजून एक गोष्ट आहे बरं का लेखनाच्या बाबतीत! कल्पनाशक्ती! जे कधीच आणि कुणाबाबतच घडले नाही तरी ते प्रत्यक्ष घडले असे लिहिता आले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या काल्पनिक कादंबऱ्या! कदाचित तसे कधी घडणारच नाही. किंवा पुढेमागे घडेल सुद्धा! कुणी सांगावं?"

"हो! तुझी जलजीवा कादंबरी मी वाचली. खूप अद्भुत कल्पनाशक्ती वापरलीय त्यात तू! म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की लेखकाकडे कल्पनाशक्ती सुद्धा आवश्यक असते संवेदनशीलते सोबत?"

"हो. अर्थातच! " मी डोळे मिचकावत त्याला म्हणालो, "आता हेच बघ ना ! आपण कधी पुण्यात असे भेटलो नाही, चहा पिला नाही आणि आपल्यात असा काही संवाद सुद्धा झाला नाही, तरीपण मी हा वरील संवाद लिहिलाच ना!"

"धन्य आहे बाबा तुझी!", असे म्हणायला ना तो मित्र तिथे होता ना मी!

कारण हा संवादच मुळात काल्पनिक आहे!!

"पण खरा असता तर तो नक्की असे म्हटला असता" डोळे मिचकावत मी माझ्या मनाशी म्हटले!!


लेख क्रमांक - ३: 

"तुला एवढा वेळ कसा मिळतो रे इतकं सगळं लिहायला? ऑफिस आणि घर सांभाळून? तू नेहमी म्हणतोस बिझी आहे आणि मग हे लिखाण कसं काय?"

मला अनेकांकडून मला असा वरीलप्रमाणे मिश्कील प्रश्न येतो. 

मी त्यांना म्हणतो, "समजा स्विमिंगची हॉबी पूर्ण करायला; क्रिकेट खेळायला, मॅच बघायला, सिनेमा टीव्ही बघायला, मित्रांसोबत गप्पा मारायला जसा तू वेळ काढतोस तसाच मी लिहायला वेळ काढतो! आणि वाचायला सुद्धा! वाचन आपलं मन विशाल आणि समृद्ध करतं!"

मग मी मनात म्हणतो, "मला खूप फास्ट टायपिंग करायची सवय झाली आहे! मोबाईल आणि लॅपटॉपवर!!" 

मनात म्हणतो नाहीतर काहीजण म्हणतात, "अरे वा! मग माझे काही कागदं जरा टाईप करून प्रिंट काढून दे!" 

एक लक्षात घ्या, जे मला अधाशीपणाने भराभर सुचतं, तेच फक्त मला फास्ट टाईप करता येतं!

मग एक अनपेक्षित प्रश्न येतो, "म्हणजे तुला मित्रच नाहीत का? तू सिनेमा टीव्ही बघत नाहीस? शारीरिक व्यायाम करत नाहीस की काय? फक्त वेळ मिळाला की लिहीतच बसतोस?"

"मित्रा हे तुझं म्हणणं म्हणजे असं झालं की, बरेच जगप्रसिद्ध यशस्वी लोक दहावी नापास होते म्हणून जो कुणी दहावी नापास होईल तो प्रत्येकजण मोठ्या कंपनीचा मालक होईल म्हणून सगळ्यांनी शिक्षण घेणे बंद करावे असे म्हणण्यासारखे आहे!"

समोर मिश्कील हास्य!

मग काहीजण विचारतात, "एवढं सगळं कसं सुचतं रे तुला?"

मी सांगून टाकतो, "ही भगवंतांची देणगी आहे की मला एवढं सगळं सुचतं. भरपूर वाचन हा सुद्धा लेखनाचा पाया आहे. तसेच सभोवतालच्या वातावरणासाठी, लोकांसाठी असलेलं संवेदनशील मन लेखनासाठी कारणीभूत ठरतं! हे असं मन मला दिलंय भगवंतानी!"

मग काहीजण म्हणतात, "लिहून काय फायदा? आजकाल लोक वाचतात कुठं?"

(हे खेदाने कबूल करावेसे वाटते की दुर्दैवाने आज भारतात वाचन फार कमी झालं आहे, पण सगळ्याच देशांत ही परिस्थिती नाही!)

मी म्हणालो, "हजारो लोकांनी नको वाचू देत. एखाद्याने वाचलं तरी मला पुरे! मी मनाच्या समाधानासाठी लिहितो...पण याचा अर्थ असा नाही की पोटापाण्यासाठी जे मी करतो ते मला आवडत नाही आणि त्यात मी समाधानी नाही!! आणि हो...जसं जिवंत राहण्यासाठी आपण श्वास घ्यायला वेळ काढतोच, तसं लिहिण्यासाठी आणि वाचनासाठी मी वेळ काढतो... लिहिणं आणि वाचणं हा माझा श्वास आहे मित्रा... "

"म्हणजे तू श्वास घ्यायचे सोडून लिहीतच बसतोस का?" 
बरे झाले असा प्रश्न अजून कुणी विचारला नाही ते!

वरील लेख लिहिण्याचे कारण खालीलप्रमाणे: 

बरेच लोक फावल्या वेळात मनाच्या समाधानासाठी, छंद म्हणून ज्या काही अनेक गोष्टी करतात त्या सगळ्याच गोष्टी पूर्ण दुनियेला दिसून येत नाहीत, पण छंद म्हणून मी जे लिहितो (कादंबरी, लेख) हे अर्थातच "वाचण्यासाठी" असल्याने वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याची जाहिरात करण्यासाठी ते सोशल मेडीयावर टाकावेच लागते जे "दिसून येते"!!


लेख क्रमांक - ४:

मला सगळेजण विचारतात, "एवढ्या मोठ मोठ्या कादंबऱ्या कधी लिहितोस तू? ते सुध्दा पर्सनल आणि प्रोफेशनल जबाबदाऱ्या सांभाळून?"

अर्थात हे सगळं आस्थेने ते विचारतात. माझी काळजी म्हणून!

मग मी त्यांना फक्त एका म्हणी द्वारे उत्तर देतो,
"थेंबे थेंबे तळे साचे!"


रोज थोडे थोडे लिहिले की त्याची काही वर्षांनी होते कादंबरी! कारण मला सलग असा वेळ मिळत नाही.

बरेचदा वेळ न मिळाल्याने लिहिण्यात खूप गॅप पडला की माझ्याच कादंबरीतल्या पात्रांची नावं आठवत नाहीत मग मीच लिहिलेले पुन्हा मीच वाचून काढतो, एखाद्या तटस्थ वाचका सारखा! आणि मग त्यात थोडा बदल करावासा वाटतो.

बरेचदा गॅप गेल्याने फायदा सुध्दा होतो...

एखादा प्रसंग मी काही दिवसांपूर्वी जसा लिहिला असता त्यापेक्षा गॅप गेल्यानंतर तो प्रसंग मी वेगळ्या पद्धतीने लिहिण्याची प्रेरणा मिळते कारण गॅप मध्ये मला त्या प्रसंगाबद्दल वेगळा दृष्टिकोन मिळतो...
कदाचित कादंबरीला एक वेगळं वळण सुध्दा मिळतं आणि तेच कादंबरीच्या फायद्याचं ठरतं...

आणि हे नंतर लक्षात येतं.

कधी कधी इतकं पटापट सुचतं की झरझर आणि भरभर लिहून मोकळे झाल्याशिवाय चैन मिळत नाही..

आणि कमी वेळेत खूप जास्त आणि खूप चांगलं लिहिल्या जातं..
अर्थात हे सगळं माझ्याकडून कोण करवून घेतं?
मला लिहिण्याची प्रतिभा आणि प्रेरणा देणारा तो भगवंत.
अधिक चांगली कलाकृती निर्माण व्हावी म्हणून कदाचित!

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली